सोलापूर : ‘पावसाचा अजून पत्ताच न्हाय... आत्ता जरी पाऊस पडला, तरी पेरणी करताच येत न्हाय...आकाड सरला की लगीच सरावन लागतूय...अणं सरावनात, तर बैल पोळ्याला ज्वारीची पेरणी करावी लागतीय... यंदाचा ही हंगाम वायाच गेला बघा... पाऊस काशाचा नुसत वारच भकाय लागलय...! आज उद्या पाऊस पडलच की पाऊस न्हाय म्हणून शेतीची कामे थांबवायची का? खरीप न्हाय साधला रब्बी, तर साधल...!’ कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील पोखरापूर येथील शेतकरी मारूती गोपीनाथ हेळकर यांनी हा आशावाद व्यक्त केला.
जिल्हयात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्यांना होळकरांचा हा आशावाद प्रेरणादायी आहे. सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी पूर्व मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा खरीप हंगाम चांगलाच साधला होता. रब्बी हंगामासाठी हा जिल्हा प्रसिद्ध असला, तरी खरीपाचेही क्षेत्र मोठे आहे. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हे दोन्ही हंगाम साधले, तरच शेती परवडते. एकाच हंगामावर अवलंबून राहिले, तर शेती परवडत नसल्याचा शेतकऱ्यांना चांगलाच अनुभव आहे.
गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील काही गावांत पाऊस पडला असला, तरी जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी अजूनही पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. पंढरपूर व मोहोळ तालुक्यात अजूनही दमदार पाऊस पडला नाही. आठ जुलै रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता; पंरतु सायंकाळी उशीरापर्यंत जिल्ह्यात कुठेही दमदार पाऊस पडल्याची नोंद झाली नाही. उलट दिवसभर वाराच सुटत असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे शेतकरी पुरते हतबल झाले आहेत.
पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकांची लागवड करता आली नाही आणि आता चांगला पाऊस पडला, तरी उशीराची पेरणी चांगली साधत नसल्यामुळे शेतकऱ्यांची भीस्त आता रब्बी हंगामावरच आहे. गेल्या आठवड्यात पाऊस पडलेल्या गावांमध्ये थोडीफार मक्याची पेरणी शेतकरी करू लागले आहेत; मात्र रब्बी हंगाम सापडत नसल्यामुळे त्या भागातील शेतकऱ्यांनी तूर, मूग, सोयाबीन व उडदासारख्या पिकांची पेरणी केली नाही. पाऊस पडला नसलेल्या भागातील शेतकरी सध्या शेतीची मशागत करण्याच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे.
या वेळी रोपळे बुद्रुकचे शेतकरी पोपट भोसले यांनी आमची भीस्त आता रब्बी हंगामावरच असल्याचे सांगितले.